Wednesday, 10 April 2019

नव्या गुंतवणुकीसोबत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज - पृथ्वीराज चव्हाण भाडिपा ‘लोकमंच’वर पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन

सुनियोजित विकासासाठी तळागाळातील माणसाला रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या सुविधा देण्याबरोबरच अन्य व्यवसायउद्योगांमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी भाडिपा ‘लोकमंच’ वर केले. लोकमंच’ या उपक्रमांतर्गत भाडिपाच्या विषय खोल’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेशी त्यांनी थेट संवाद साधला.
आज हवी तेवढी गुंतवणुक नसल्यामुळे राज्यातील बेरोजगारी वाढत चालेली आहे. नव्या रोजगारासाठी नव्या उद्योगधंद्यांना चालना देत त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत शिक्षण संस्थामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखविली. आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करताना राज्याच्या सर्व विभागांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न होणे आवश्यक असून कॉंग्रेस त्यासाठी प्रयत्नशील असून राहुल गांधीनी दिलेला गरिबी हटाव’ हा नारा त्याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महिला सक्षमीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीजास्त महिलांना सहभागी करणे आवश्यक असल्याचे सांगत महिलांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आपला पहिला प्राधान्यक्रम असायला हवा व त्यासाठी ठोस कृतीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. साहित्य संघामध्ये रंगलेल्या या परिसंवादात पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगवेगळ्या अनेक मुद्द्यांना स्पर्श करत आपला आजवरचा प्रवास ही उलगडला.

No comments:

Post a Comment