Tuesday, 25 March 2025

. भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धामुंबई, पुणे आणि ठाण्याचा निसटता विजय!

इचलकरंजी, दि. २५ मार्च – कै. भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धेत मंगळवारी प्रेक्षकांच्या ह्रदयाचे ठोके वाढवणारे अटीतटीचे सामने रंगले. अवघ्या एका गुणाच्या फरकाने तीन संघांनी विजय मिळवत दिवस गाजवला.
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने इचलकरंजीतील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्र. २१च्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात मुंबईने धाराशिवला, पुण्याने ठाण्याला, तर किशोरी गटात पुण्याने ठाण्यावर निसटता विजय मिळवला.
पुरुष गटातील थरारक सामने
मुंबई आणि धाराशिव यांच्यातील चुरशीच्या सामन्यात सनी तांबेच्या अष्टपैलू खेळाने (१.५० व १.०० मिनिटे – २ गुण) आणि वेदांत देसाईच्या पाच बळींच्या जोरावर मुंबईने अवघ्या एका गुणाने धाराशिववर बाजी मारली. मध्यंतराला मुंबईने १०-८ अशी आघाडी घेतली होती, जी त्यांना विजय मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरली. धाराशिवच्या रवी वसावे (१.३० व १.०० मिनिटे) आणि श्रीशंभो पेठे (४ गुण) यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
आणखी एका अटीतटीच्या सामन्यात पुण्याने ठाण्यावर १८-१७ असा निसटता विजय मिळवला. मध्यंतराला ९-१० अशा एका गुणाने पिछाडीवर असलेल्या पुण्याने दुसऱ्या डावात उत्कृष्ट खेळ करीत विजय साकारला. पुण्याच्या साहिल चिखले याने सात गडी बाद करीत १.४० मिनिटे संरक्षण केले, तर ठाण्याच्या शुभम जाधवने १.१० आणि १.५० मिनिटे पळती खेळली.
किशोरी गटात पुण्याचा रोमांचक विजय
पुणे आणि ठाणे यांच्यातील किशोरी गटाचा सामना देखील चुरशीचा ठरला. पुण्याने १९-१८ अशा एका गुणाने विजय मिळवत स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. मध्यंतराला पुण्याने ९-७ अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती, जी अखेरपर्यंत कायम ठेवत त्यांनी विजय संपादन केला. पुण्याकडून आरती घट्टेने (१.४० मिनिटे व ५ गुण) तर ठाण्याकडून प्रणिती जगदाळेने (२.१० मिनिटे व ५.४० मिनिटे) अष्टपैलू खेळ करत संघाला उभारी देण्याचा प्रयत्न केला.
अन्य गटांतील निकाल:
किशोर गट: सांगलीने धाराशिववर १४-११, कोल्हापूरने साताऱ्यावर २०-१३, सांगलीने नागपूरवर १७-८ असा विजय मिळवला.
किशोरी गट: पुण्याने नागपूरवर १३-१०, सांगलीने धाराशिववर १५-८, ठाण्याने सोलापूरवर १४-१० असा सहज विजय साकारला.
पुरुष गट: अहिल्यानगरने गडचिरोलीवर १४-१२, सांगलीने अमरावतीवर १५-१४, सोलापूरने अमरावतीवर १४-१३ असा रोमांचक विजय मिळवला.
महिला गट: सोलापूरने नागपूरवर १३-१०, कोल्हापूरने नाशिकवर १४-१३, धाराशिवने मुंबईवर १२-७ असा विजय मिळवला.

स्पर्धेतील सामना दररोज अधिकाधिक उत्कंठावर्धक होत असून, पुढील दिवसांत अजून चुरशीच्या लढती पाहायला मिळतील, अlदाज क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment