Friday 23 August 2019

'युवा फोर्स' करणार पूरग्रस्तांना मदत!!







महाराष्ट्रात आलेल्या पुराचा फटका कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरात फार मोठ्या प्रमाणावर बसला आहे. ५०पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण या पुरात गमवावे लागले आहेत. अनेकांची घरे उध्वस्त झाली; तर व्यवसाय, घरदार सारे काही वाहून गेले. या सर्व कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची नितांत गरज होती. 'झी युवा' वाहिनीने, 'युवा फोर्स' हा उपक्रम हाती घेतला व पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तरुणवर्ग तिथे पोचला. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर, एक हजाराहून अधिक लोकांनी संपर्क साधला. यातून ५० जणांची एक टीम तयार करण्यात आली. श्रमदानाची गरज पूर्ण करण्यासाठी 'झी युवा'च्या उपक्रमातून मदतीचा हात मिळाला आहे. 
श्रावण हा सणांचा महिना असल्याने, उर्वरित महाराष्ट्रात गोकुळ अष्टमी, दहीहंडीसारखे सण साजरे होत असतांना, 'युवा फोर्स' उपक्रमाअंतर्गत, युवकांची टीम, पूरग्रस्त भागात कार्यरत असणार आहे. तरुणवर्ग  आपली जबाबदारी जाणून घेऊन, सणसमारंभाहून अधिक महत्त्व या मदतकार्याला देत आहे. २४ ऑगस्ट २०१९ रोजी, कोल्हापुरातील कुंदवाडा परिसरात ५० जणांच्या गटामार्फत हे मदतकार्य केले जाणार आहे. अनेक ठिकाणाहून वस्तूंच्या स्वरूपात मदत पोचली आहे. परंतु, या उपक्रमाच्या माध्यमातून एक निराळ्या प्रकारची मदत करण्याचा हा वाहिनीचा प्रयत्न असेल. केवळ वस्तूंच्या स्वरूपातील मदत पुरेशी ठरणार नसल्याने, हा खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छता व निर्जंतुकीकरण हा या कामाचा एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. याव्यतिरिक्त, प्रथमोपचार व आरोग्य केंद्रांची स्थापना या उपक्रमाच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात करण्यात आली आहे. या मदतकार्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून, तिथल्या लोकांसाठी विविध मनोरंजनाचे उपक्रम सुद्धा सादर करण्यात येतील. लोकांनी त्याच नकारात्मक वातावरणात अडकून राहू नये, यासाठी या मनोरंजनाचे आयोजन करण्याचे या गटाने ठरवले आहे. याशिवाय तिथल्या लहान मुलांसह वेगवेगळे खेळ खेळून, त्यांना नकारात्मक वातावरणातून बाहेर काढण्याचं प्रयत्न करण्यात येईल. मनावरील ताणतणाव हलका होईल याची सुद्धा खबरदारी घेण्यात येईल. केवळ शारीरिकच नाही तर मानसिक थकवा दूर व्हावा आणि साऱ्यांनाच आयुष्याचा नवा सूर सापडावा यासाठी 'युवा फोर्स' हा उपक्रम घेणार आहे. मानसिक आरोग्याचे पुनर्वसन करण्यासाठी, मनशक्ती प्रयोग केंद्राच्या बरोबरीने हे विविध उपक्रम पूरग्रस्त परिसरात राबवण्यात येणार आहेत. 'झी युवा' करत असलेली ही मदत, परिस्थिती बदलण्यात फार उपयोगी ठरणार नसली, तरीही लोकांच्या चेहऱ्यावरील हसू परत आणण्यास हातभार लावेल, हे मात्र नक्की!

No comments:

Post a Comment